तालुक्यातील वडाळामहादेव येथे टेम्पो व अॅपेरिक्षा यांच्या समोरासमोर झालेलेल्या धडकेत रिक्षाचालक जागीच ठार झाला. रिक्षातील तीन महिलांसह पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील कामगार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कानिफनाथ शेळके असे मयत रिक्षा चालकाचे तर कांतीलाल जाधव, बाळू कसबे, केशरबाई राठोड, मंदा तोरणे, वसंत राठोड अशी जखमींची नावे आहेत. याबाबत सविस्तर असे की, सकाळी मजुरांना घेवून टिळकनगरकडे जात असताना रिक्षास (एमएच १७ के ६३४८) नेवासा रस्त्यालगतच्या तय्यबजी फार्मजवळ श्रीरामपूरकडून नेवाशाकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच १७ एजी ७८८) जोरदार धडक दिली. यात चालक कानिफनाथ शेळके हा जागीच ठार झाला. इतर जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले.
शहर पोलीस ठाण्यात टेम्पोचालक शेख सलीम अब्दुल अजीज याच्याविरुध्द अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघातस्थळी आरेरावीची भाषा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ संतप्त जमावाने काही काळ रास्तारोको केला. पोलीस उपनिरीक्षक भारत बलैय्या यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.