रिक्षाच्या ई-मीटरचा आर्थिक फटका ग्राहकांना कसा बसू शकतो, याचा कटू अनुभव बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष निरीक्षकांनाच आला. अर्धा किलोमीटर रिक्षा धावल्यानंतर त्याचे भाडे ई-मीटरवर चक्क १ हजार ११४ रूपये इतके दाखविण्यात आले. यामुळे अधिकाऱ्यांसह रिक्षाचालक चाट पडले.
कोल्हापुरातील रिक्षाचालकांचे ई-मीटरच्या विरोधात गेले तीन दिवस बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. ई-मीटरचा फटका कसा बसू शकतो, याचे प्रात्यक्षिकच रिक्षा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखविले. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विशेष निरीक्षकांना एकनाथ एकबोटे यांच्या मालकीच्या एक वर्षांपूर्वी घेतलेल्या एमएच ०९-क्यू-७९२७ या ई-मीटर असलेल्या रिक्षातून प्रवास करण्यास सांगितले. त्यावेळी फक्त अर्धा कि.मी.अंतर कापल्यानंतर या ई-मीटरवर १ हजार ११४ रूपये इतके भाडे दाखविण्यात आले. व त्यावेळी या मीटरला खात्याने लावलेले सील हे सुस्थित होते, असे निदर्शनास आले.हा प्रकार पाहून अधिकारीसुध्दा चक्रावून गेले. त्यामुळे रिक्षाचालकांनी ई-मीटरची सक्ती कशी चुकीची आहे,हे दाखवून ई-मीटर रद्द करावे, अशी मागणी केली.    
रिक्षामधील जुन्या मीटरमध्ये रिक्षा व्यावसायिक फेरफार करतात व प्रवाशांची लुबाडणूक करतात, असे म्हणून राज्य शासनाने महापालिका व क वर्ग नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये ३ मीटरची सक्ती केली आहे. गेले वर्षभर राज्यामध्ये विविध ठिकाणी ही ई-मीटर सदोष आहेत व त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे पुरावे देऊन सिध्द केले आहे. तरी देखील शासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. शासनाने ही भूमिका बदलावी, अशी मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे.