कपडय़ाने चेहरा झाकलेल्या चार ते पाच जणांच्या टोळीने बलापूर पश्चिम येथील इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना बांधून ठेवून २० टन स्टील चोरल्याची घटना घडली आहे. अशा प्रकारे चोरी करण्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. या ऐवजाची किम्मत १० लाख रुपये आहे.
१३ मे रोजी बदलापूर येथील एरंजाड भागात पहाटे अडीचच्या सुमारास येथील सुरक्षा रक्षकांना चार ते पाच जणांच्या टोळक्याने धमकावून त्यांना बांधून ठेवले. यानंतर लगेचच १० ते १५ जणांचा जमाव येथे आला. या चोरटय़ांनी साइटवर असलेले स्टील ट्रकमध्ये भरले आणि ते पसार झाले. यानंतर १८ मे रोजीदेखील असाच प्रकार घडला. या दोन्ही दिवसांमध्ये अंदाजे २० टन स्टीलची चोरी करण्यात आली असून त्याची किंमत १० लाख रुपये आहे. या चोरटय़ांकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याने येथील सुरक्षा रक्षकांना त्यांचा प्रतिकार करणे शक्य होत नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.