राज्यात अन्न व औषध विभागाच्या कार्यालयासाठी जागेची समस्या असल्याने पर्याय म्हणून प्रत्येक विभागात फिरती प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती गृह व ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
आमदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्ताने सतेज पाटील हिंगोली दौऱ्यावर आले होते. तेव्हा दाभोलकर हत्या प्रकरणाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे यांनी केलेले आरोप प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असून त्यांचे त्यांनी पुरावे सादर करावेत.
अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरू करण्यासाठी जागेची समस्या असल्याचे ते म्हणाले. त्यावरील एक उपाय म्हणून प्रत्येक विभागात फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल. त्याकरिता लवकरच वाहन खरेदी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्हा प्रशासन जागा देणार असल्यास येथे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. निधीअभावी जिल्हा पोलीस मुख्यालयाचे काम बंद असल्याने लवकरच दीड कोटीचा निधी देण्यात येईल. तसेच कारागृहाचा प्रश्नदेखील मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस भरती करणार असल्याचे सांगून ग्रामपंचायतअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे निकष ठरवून कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य शासन निर्णय घेणार आहे.