नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत आरोग्याच्या प्रश्नावरून विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा ठेका देण्यावरून नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना नगराध्यक्ष राजश्री ससाणे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची पुरती दमछाक झाली.
शहरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. जागोजागी तुंबलेल्या गटारी, कचऱ्याचे ढिगारे त्यावर फिरणारी मोकाट जनावरे असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यावर पालिकेने घनकचरा व्यवस्थापन कामाचा ठेका पुणे येथील ईबीजी या एजन्सीला दिला आहे. कचरा गोळा करणे व कचरा वाहून नेणे आदी कामे केले जाणार आहे. त्यासाठी १५ लाख ९० हजार प्रतिमहिना असा खर्च केला जाणार आहे. तसेच ठेका देण्यापर्वी सदर कामाचा अनुभव या एजन्सीला आहे का असा सवाल करून दोन-तीन महिने या एजन्सीकडन ट्रायल बेसवर काम करून घ्यावे त्याचबरोबर या एजन्सीवर पालिकेचे नियंत्रण असावे म्हणून प्रभागनिहाय नियंत्रक नेमावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.
शहरात होणारी विकासकामे कागदावरतीच वाचून दाखविण्यासाठी नसावी तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी. त्यासाठी प्रभागनिहाय नगरसेवकांना सदर विकास कामांच्या प्रती देण्यात याव्या अशी मागणी नगरसेवक संजय छल्लारे यांनी केली. राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांच्या कामासाठी अनुदान मिळण्यासंदर्भात माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे प्रयत्नशील असल्याचे या वेळी सांगितले. श्रीरामपूर नगरपरिषदेचे अण्णाभाऊ साठे खुले नाटय़गृह विकसित करण्यासंदर्भात पालिकेत काही वेळ वादंग घडला.