महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावी परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ८२.९३ टक्के लागला आहे. यावर्षी राज्यातील नऊही विभागीय मंडळाच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी राज्यात नागपूर विभागीय मंडळ आठव्या स्थानावर आहे, तर अमरावती विभागीय मंडळ सातव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ८.९४ टक्क्यांनी वाढला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
गेल्या वर्षी नागपूर विभागाच्या निकालाचे प्रमाण ७३.९९ टक्के होते, हे लक्षात घेता यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी ८.९४ टक्क्यांनी वाढली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांंचा निकाल गेल्या वर्षी २७.७९ टक्के लागला. तो यावेळी २३.८० टक्के आहे. म्हणजेच ३. ९९ टक्क्यांनी कमी लागला आहे. नागपूर विभागातून एकूण १ लाख ७५ हजार ५२३ विद्याथ्यांपैकी १ लाख ४५ हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८२.९३ टक्के आहे. यात मुलींनी आघाडी घेतली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८.५० टक्के, तर मुलींचे प्रमाण ८५.३९ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) म्हणून या परीक्षेला २८ हजार ९३० बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी २३.८० आहे.
नागपूर विभागात सर्वात जास्त निकाल नागपूर जिल्ह्य़ाचा लागला असून उत्तीर्णाची टक्केवारी ८७.४७ टक्के आहे. त्याखालोखाल गोंदिया ८६.९०, चंद्रपूर (८१.३५), वर्धा (८०.२७), गडचिरोली (७४.९८) आणि भंडारा (७४.६९) अशी जिल्हानिहाय टक्केवारी असून, भंडारा जिल्ह्य़ाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७४. ६९ टक्के आहे. यावेळी गणिताचा पेपर १५० गुणांऐवजी १०० गुणांचा करण्यात आला होता. त्यात ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची अंतर्गत मूल्यामापनाची परीक्षा घेण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची ८० गुणाांची लेखी व २० गुणांची प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने शिक्षण मंडळाने यंदा इंग्रजी भाषेसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका योजना आखली होती. नागपूर विभागात यंदा तोतयेगिरीची ५, तर कॉपीची १६९ प्रकरणे पकडण्यात आली. यापैकी जवळपास सर्वच प्रकरणाचा निकाल लावण्यात आला आहे.
शिक्षण मंडळातर्फे कनिष्ठ महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप २६ जूनला सकाळी ११ वाजता करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपासून गुणपत्रिका मिळू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर विहित नमुन्यात शुल्कासह ५ जुलैपर्यंत मंडळाकडे अर्ज करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे आवश्यक राहील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेची प्रत त्यासाठी चालणार नाही. ऑक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांंना ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरावयाची असल्यास त्याबाबतच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. यावर्षी केंद्रीय प्रवेश पद्धतीने अकरावीचे प्रवेश होणार असल्यामुळे ऑनलाईनद्वारे मिळालेल्या गुणपत्रिकेवर अर्ज विकत घेता येऊ शकतो. मात्र, अर्ज संकलनाच्या वेळी मूळ गुणपत्रिका लावावी, असेही मंडळाने कळविले आहे. निकालानंतर विद्याथ्यार्ंनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या विद्याथ्यार्ंना छायाप्रत हवी असेल, असे विद्यार्थी ५ जलैपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज प्राप्त करू शकतील.

नागपूर विभाग : पाच वर्षांतील निकालाची टक्केवारी
२००९ – ८०. ६९, २०१० – ८३.८०
२०११ – ७३.८९, २०१२ – ७४.५५
२०१३ – ७३.९९, २०१४ – ८२.९३