जैन साध्वी सरिताश्री यांचे आज सकाळी पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात (ता. नगर) अपघाती निधन झाले, त्या ४० वर्षांच्या होत्या. या अपघातात साध्वी जिनेशाजी (वय ३५) जखमी झाल्या. त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य पाच साध्वी मात्र सुखरूप आहेत. सकाळी ६ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला होता, त्यास नंतर केडगावजवळ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले.
साध्वी सरिताश्री यांच्यावर सायंकाळी नगरमधील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नगरसह पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद येथील जैन समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. साध्वी सरिताश्री यांचा, अक्षयतृतीयेचा पारणा महोत्सव नुकताच नगरमध्ये झाला होता.
आगामी चातुर्मास पुणे येथे होणार असल्याने साध्वी विरक्तीश्री, साध्वी विभक्तीश्री, साध्वी कनिकाश्री, साध्वी भक्तीश्री व साध्वी करुणाश्री यांच्यासमवेत साध्वी सरिताश्री यांची पदयात्रा शिरूरकडे चालली होती. आजारपणामुळे सरिताश्री व्हीलचेअरवर होत्या. कामरगावजवळील वळणावर रस्ता दुभाजकाचे काम अद्याप अपूर्ण आहे. नगरकडे येणा-या मारुती स्विफ्ट (क्र. जीए ०३ एन १६८२) कारने साध्वींच्या या जथ्यास धडक दिली. साध्वी सरिताश्री यांचे जागीच निधन झाले.
अपघात झाला त्या वेळी नगरमधील शांताराम राऊत हे तेथूनच पुण्याकडे जात होते, त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने नगरसेवक संजय चोपडा, बाबूशेठ बोरा, राजेंद्र चोपडा आदींना ही माहिती दिली. या सर्वानी दोन्ही साध्वींना तातडीने नगरला रुग्णालयात आणले.
साध्वी सरिताश्री यांनी १९९८ मध्ये शिरूर येथे दीक्षा ग्रहण केली होती. त्यांना पंजाब उपप्रवर्तिनी पद प्रदान करण्यात आले होते. नगर तालुका पोलिसांनी कारचालक प्रशांत गंगावणे (पणजी, गोवा) याला अटक केली आहे. अपघानंतर तो कारसह पळून चालला होता, नगरसेवक चोपडा यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली, नंतर त्याला केडगावजवळ पकडण्यात आले.