सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जैनापूर येथे भूसंपादनाचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी मोठय़ा प्रमाणात शेतजमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू असून शासनाने शेतकऱ्यांना या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वार केली आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बसवानिखड ते तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर मार्गे दपदरी रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यांसाठी शेतजमिनी ताब्यात घेण्यात येत आहेत. रस्त्याचे काम करताना झाडे, इमारती, विहीर इत्यादीचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना याचा धनादेश अथवा रोख रक्कमेच्या स्वरूपात मोबदला मिळावा. जमिनीस २ लाख रुपये प्रती गुंठा दराने मोबदला द्यावा. शेतकऱ्यांच्या हाती मोबदल्याची रक्कम पडल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा जैनापूर येथे सर्व ग्रामस्थ व शेतकरी रस्त्याच्या कामास विरोध करतील असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच बापू पाटील, श्रेयांस पाटील, अनिल िशदे, मारुती आंबी, अनिल पाटील, संजय पाटील, निळकंठ राजमाने, बाळासो पाटील, संजय दळवी, नेमिनाथ मगदम, सातगोंडा पाटील, सूर्यकांत इंगळे, विजयकुमार चौगुले, व्यंकट आडसुळे, सुलतान तिवडे, वसंत तिवडे यांसह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.