कल्याण तालुक्यातील ४० गावे तसेच लगतच्या चार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या रायता गावालगतच्या उल्हास नदीपात्राची स्वच्छता करून गोवेली महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जागतिक जल दिन साजरा केला. या परिसरातील पाणीपुरवठय़ाचा एकमेव स्रोत असूनही नागरिक सर्रास नदीपात्रात कचरा, निर्माल्य आणि सांडपाणी टाकतात. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नदीकिनारपट्टीच्या गावांमध्ये रॅली काढली. जिल्हा कृषी अधिकारी डॉ. सुधीर घाडगे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नदीपात्रात उतरून त्यातील कचरा काढला. तसेच पात्राच्या दोन्ही बाजूला नदीपात्रात निर्माल्य तसेच प्लास्टिक टाकू नका अशा आशयाचे फलक लावले.