अकलूजजवळील माळीनगरच्या सासवड माळी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे यांच्या विरुद्ध डोिबवलीस्थित एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.डोंबिवली येथील एक महिला सासवड माळी साखर कारखान्याला साहित्य पुरविण्याचा ठेका मिळण्यासाठी पतीसह माळीनगरात आली होती. तिने कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे यांची भेट घेतली असता त्यांनी सदर महिलेला कारखान्याच्या विश्रामगृहात मुक्कामाची विनंती केली. त्यानुसार विश्रामगृहात विश्रांती घेत असताना सदर महिलेच्या कक्षात मध्यरात्री जाऊन गिरमे यांनी, ‘मी तुम्हाला कारखान्याची ऑर्डर देतो, तुम्ही मला खूश करा’ असे सांगून तिचा विनयभंग केला. तेव्हा सदर महिलेने आरडाओरड करताच तिचे पती झोपेतून जागे झाले. त्यानंतर गिरमे यांनी तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या २५ जानेवारी रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी सदर महिलेने ई-मेलवरून अकलूज पोलीस ठाण्यासह पोलीस महासंचालक व गृहमंत्र्यांकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर तिने समक्ष अकलूज पोलीस ठाण्यात येऊन फिर्यादीचा जबाब दिला. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांनी सांगितले.