पनवेलच्या पाणीप्रश्नी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी पनवेल एसटी स्टॅण्ड येथील पाणी टाकी येथे मोर्चाचे आयोजन केले होते, परंतु पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे हे आंदोलन बारगळले. ‘शोले’ स्टाइल आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेला निवेदन देण्याखेरीज व प्रशासकीय आश्वासनाखेरीज काहीच साधता आले नाही.  
मनसेने आंदोलनाचा एक भाग म्हणून ‘धरण उशाशी आणि घशाला पडली कोरड’ अशी भित्तीपत्रे छापून शहरभर वाटली होती. मंगळवारी मनसेचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीकडे अनोखे आंदोलन करणार असल्याचे जाहीर झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेच्या या आंदोलनात सामान्य पनवेलकरांची हजेरी दिसत नव्हती. घोषणाबाजी सुरू झाल्यावर पोलिसांनी आंदोलकांना टाकीच्या प्रवेशद्वारावरच रोखले. पनवेल नगर परिषदेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी येथे मनसेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. उन्हाच्या चटक्यांमुळे चर्चा पंधरा मिनिटांतच आटपली. मनसेने या चर्चेवेळी सामान्य पनवेलकरांची व्यथा अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांच्याकडे मांडली. मुनोत नगर, आदित्यविहार, रचना हाइट्स, लाइन आळीतील काही परिसर, पायोनियर सोसायटी, जनार्दन सहनिवास येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही याकडे मनसेचे शीतल शिलकर व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.  

मोठय़ा व्यासाची जोडणी न घेतल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा
एमजेपीच्या जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे दोन दिवस एमजेपीने शटडाऊन घेतले होते. त्यामुळे पनवेलचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही, असे मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले. इमारतीच्या बांधकामावेळी विकासकांनी घेतलेल्या जोडण्यांद्वारे अजूनही संबंधित सोसायटय़ांना पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे जुन्या जोडण्याऐवजी मोठय़ा व्यासाची जोडणी संबंधित सोसायटय़ांनी घेणे आवश्यक होते. परंतु ती न घेतल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे होते.  पनवेलच्या काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत टँकरची मागणी रहिवाशांकडून कमी होत आहे. मागणीनुसार नगरपरिषद पाणीपुरवठा करत आहे. लवकरच सिडकोकडून टँकरसाठी स्वतंत्र जोडणी घेण्यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. ही जोडणी मिळाल्यास पनवेलकरांना किमान टँकरद्वारे मागणीएवढा पाणीपुरवठा होईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.