विद्यार्थी, पालकांमध्ये हस्ताक्षराविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डोंबिवलीतील एका संस्थेने आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हस्ताक्षर ठराविक साच्यातून हस्तांक्षर विकसित करुन सुमारे एक कोटी विद्यार्थी-पालकांकडून भारतीय प्रतिज्ञा लिहून घेण्याचा संकल्प येथील अक्षरगंध या संस्थेने सोडला आहे. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत हा संकल्प पूर्ण करण्यात येणार असून अधिकाधिक शाळा, विद्यार्थी, पालकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सुंदर हस्ताक्षर जागृती अभियानातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थी, पालकांना कलात्मक, अर्थपूर्ण रचनांमधून आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. त्यांना संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे अक्षरगंधचे संचालक निलेश बागवे यांनी सांगितले.
या उपक्रमाचा भाग म्हणून नुकतेच आनंद बालभवन येथे अक्षरजत्रा नावाने प्रदर्शन आयोजित केले होते. कॅलिग्राफी या हस्तकलेच्या माध्यमातून अक्षरांची कलात्मकता कोणत्याही साच्यामध्ये बसविता येऊन त्या माध्यमातून  कलाविष्कार साधता येतो. हे या प्रदर्शनातून दाखविण्यात आले. शेकडो विद्यार्थी, पालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. भारतीय प्रतिज्ञा लिहिताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मी भारतीय म्हणून उमटणारे तरंग खूप महत्वाचे ठरणार आहेत. म्हणून सुंदर हस्ताक्षरासाठी प्रतिज्ञेची निवड करण्यात आली आहे, असे उल्का बागवे यांनी सांगितले. या अभियनात सहभागी होण्यासाठी  ९२२४४५३६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.