आंघोळीसाठी बंधाऱ्यात उतरलेल्या दोघा अल्पवयीन मुलींना खोलीचा अंदाज न आल्याने प्राण गमवावे लागल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली.
तालुक्यातील उमरागव्हाण गावाजवळ अंबारीबारपाडा आहे. या गावाजवळच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. कालूबाई गिरमी वळवी (१२) ही इयत्ता सहावीत असणारी विद्यार्थिनी आपली चुलत बहीण इयत्ता तिसरीत शिकणारी कुवीबाई बोक्या वळवी (९) हिच्यासह रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी दोघी बहिणी आढळून न आल्याने ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली असता बंधाऱ्यात त्या बुडाल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले. या विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळेतील होत्या की आश्रमशाळेतील, यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही. मोलगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.