राज ठाकरे यांचे महापौर व पालिका प्रशासनास निर्देश
शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम राबवावी आणि अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी माती व कचऱ्याचे ढिगारे तसेच झाडाच्या तोडलेल्या फांद्या पडल्या असून त्या तात्काळ हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आपण महापालिका प्रशासन व महापौरांना दिले असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज यांनी पालिका आयुक्त संजय खंदारे यांच्यासह महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्याशी सोमवारी सकाळी चर्चा केली.
त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक मुद्यांवर विचारविनिमय केल्यावर त्यांची स्वारी राजगड या पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाली. न्यायालयाचा आदेश आल्याशिवाय पालिका अतिक्रमण हटवित नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या मुद्यावर बोलताना राज यांनी शहरात अस्ताव्यस्तपणे पसरलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याची सूचना आपण प्रशासनाला केल्याचे नमूद केले. या अतिक्रमणांमध्ये मनसेच्या पदाधिकारी वा लोकप्रतिनिधीच्या बांधकामांचा समावेश असेल अथवा त्यांनी या मोहिमेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी कोणाचे ऐकू नका, असे स्पष्टपणे बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांच्या कडेला अनेक ठिकाणी माती व कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. वीज वाहिन्यांसाठी अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्याही रस्त्यावरच पडून आहेत. पालिकेने हे सर्व तातडीने हटवून शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील महिन्याच्या सुरूवातीला म्हणजे नऊ ते ११ जुलै दरम्यान आपण शहराचा दौरा करणार असून त्यावेळी या विषयात काय कार्यवाही झाली त्याची छाननी केली जाईल, असेही राज यांनी नमूद केले.
पालिका आयुक्तांशी झालेल्या बैठकीत गोदा पार्क व रस्त्यांच्या कामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचे दृश्य स्वरूप दिसण्यास अजून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल. मागील अनुशेष इतका बाकी होता की तो काढण्यात बराच वेळ गेला. शहराचा विकास व्हावा ही आपली आवड आहे. मनसेला सत्ता मिळाली म्हणून काम करायचे, असा त्यात भाग नसतो. सत्तेचा आनंद लुटणे हा आपला स्वभाव नाही. प्रेमाला जागणे हा आपला स्वभावधर्म आहे. त्यामुळे नाशिककरांची कधी प्रतारणा होणार नाही. जो विकास नागरिकांना अपेक्षित आहे, तोच आपणास अपेक्षित आहे. केवळ त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा, असा सल्ला राज यांनी पुन्हा एकदा दिला.

खासगीकरणाच्या नावानं चांगभल..
पालिका निवडणुकीपूर्वी आपण केवळ जकातीचे खासगीकरण रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शहरातील स्वच्छतेसाठी दंडात्मक कारवाईचे ‘अमूल्य’ संस्थेला दिलेल्या ठेक्यासह पालिकेच्या इतर कामांमध्ये खासगीकरणाचे राज ठाकरे यांनी समर्थन केले. शहरात केरकचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेली ही खासगी संस्था मोठय़ा प्रमाणात दंड जिथून वसूल होईल, अशा घटकांवर कारवाई करत असल्याच्या प्रश्नावर राज यांनी एकूणात खासगीकरण हा विषय आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. या पद्धतीने कार्यवाही करायला पालिकेची यंत्रणा अपुरी पडते. खासगीकरणामुळे काम योग्य पद्धतीने कसे होते यासाठी भिवंडीतील वीज वसुलीचा त्यांनी दाखलाही दिला. जकातीचे खासगीकरण रद्द करण्याचा विषय वगळता आपण इतर कोणत्याही कामातील खासगीकरणाबद्दल बोललेलो नाही. सर्वसामान्यांनीही एखादे काम होत आहे, हे महत्वाचे समजून कोणामार्फत ते होत आहे, याबद्दल फारसा विचार करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. यापुढे ‘अमूल्य’ संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी अखेरीस नमूद केले.

गोडसेंचे राजकारण लवकरच समजेल..
मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत गेलेले हेमंत गोडसे यांनी जे जातीयवादाचे आरोप केले, त्यात कोणतेही तथ्य नाही. छगन भुजबळ व वसंत गिते यांच्यात साटेलोटे असल्याचा त्यांचा आरोप तथ्यहीन असून आगामी निवडणुकीत कोणात खरे साटेलोटे आहे ते उघड होईल, असे सांगत राज ठाकरे यांनी गोडसेंचा मनसेला कोणताही उपयोग नसल्याचा टोला लगावला. शिवसेनेत प्रवेश करताना गोडसेंनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गिते यांच्यावर जातीय राजकारणाची तोफ डागली होती. मनसेत विशिष्ट जातीच्या पदाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण पदांसाठी विचार केला जातो, पक्षाध्यक्षांना भेटू दिले जात नाही, स्थानिक पातळीवर गिते व भुजबळ यांची छुपी युती आहे, असे आरोप गोडसेंनी केले होते. या मुद्यावर राज यांनी गोडसेंवर आपल्या खास शैलीत शरसंधान साधले. गोडसे यांना लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये प्रत्येकवेळी उमेदवारी हवी होती. पक्ष कामात त्यांचा कधीही सहभाग नव्हता. हे काय राजकारण चाललंय ते समजत नाही. जातीयवादाला कोण खतपाणी घालतंय हे आगामी निवडणुकीपूर्वी सर्वाच्या लक्षात येईल, असेही राज यांनी नमूद केले.