सोलापूर शहर व परिसरात मार्चअखेरीला व चालू एप्रिल महिना उजाडताच तापमान वाढत ४२ अंश सेल्सियसपर्यंत पारा गेला असताना सायंकाळनंतर अचानकपणे हवामानात बदल होऊन सोसाटय़ाचे वारे वाहू लागले. त्यामुळे बेमोसमी पाऊस पडणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. रात्री जोरदार वादळी वारे घोंगावू लागल्याने सोलापूरकरांना किंचित गारव्याचा सुखद अनुभव घेता आला.
गेल्या आठवडय़ापासून तापमानाचा पारा विशेषत्वाने वर चढू लागल्याने यंदाचा उन्हाळा आणखी असह्य़ ठरत आहे. पारा ४२ अंश सेल्सियसची रेषा ओलांडल्याने सूर्यनारायण आगच ओकत आहे की काय, असे वाटू लागले आहे. त्यात मंगळवारी सायंकाळी अचानकपणे वातावरणात बदल होऊन वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती.