अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांच्या विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवार १७ मे रोजी पालिकांच्या विशेष सभा जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी जाहीर केल्या आहेत.
स्थायी समिती तसेच विषय समिती सदस्यांची संख्या निश्चित करणे, उपाध्यक्ष कोणत्या समितीचे पदसिद्ध सभापती असतील ते ठरविणे, विषय समिती सदस्यांचे नामनिर्देशन करून त्यांची नावे जाहीर करणे तसेच स्थायी समितीची रचना व सदस्यांची नावे जाहीर          करणे हे विषय विशेष सभेपुढे असणार आहेत.
अंबरनाथच्या सभेत उल्हासनगरचे तहसीलदार अमित सानप तर बदलापूर येथील सभेस अंबरनाथचे तहसीलदार बाळासाहेब खांडेकर पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पूर्वी विषय सदस्य आणि सभापतींची निवड एकाच दिवशी होत होती. आता सभापतींची निवडणूक काही दिवसांनी होते. त्यामुळे सभापतीपदासाठी अवधी कमी मिळतोच, शिवाय घोडेबाजाराला संधी मिळते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे एकाचवेळी ही प्रक्रिया व्हावी, अशी मागणी केली जात आहे.