दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना मानसिक ताण आल्यामुळे एका विद्यार्थ्यांने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना शहरातील शुक्रवार पेठेत घडली. अरबाज अ. सलाम शेख (१७) असे दुर्दैवी मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मृत अरबाज हा शुक्रवार पेठेतील ड्रीम लॅन्ड अपार्टमेंटमध्ये आई-वडिलांसह राहत होता. तो यंदा दहावी परीक्षेला बसला होता. पुढील महिन्यात परीक्षा होणार असताना अरबाज यास परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाचा ताण होता. त्यातूनच वैफल्यग्रस्त होऊन त्याने स्वत:च्या घरात पेटवून घेतले. यात तो ९५ टक्के भाजून जखमी झाला असता त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात दाखल केले असता अखेर त्याचा मृत्यू झाला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
तरुणीची आत्महत्या
होटगी रस्त्यावर राहुलनगरात राहणाऱ्या अमृता ब्रह्मदेव क्षीरसागर (२५) या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात विजापूर नाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर दयानंद महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या हुसेन बाबूलाल सगरी (३०) या तरुणानेही अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.