दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा जबर तडाखा उन्हाळी पिकांना बसला आहे. उन्हाळी पिके, संत्रा व केळी बागा सुकू लागल्याने विदर्भातील बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळी स्थितीचा मोठा फटका उन्हाळी पिकांनाही बसला असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. पश्चिम विदर्भात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. खरीप हंगामात पिके निघाली, पण रब्बी व उन्हाळी हंगामात पिकांसाठी पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याअभावी जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणीच झाली नाही. सूर्यफूल व भुईमुगाच्या पेऱ्यात यावर्षी मोठी घट झाली. दुष्काळीस्थितीची फारशी झळ पूर्व विभागाला बसली नाही. या विभागात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. इतरत्र मात्र पाण्याअभावी पेरणी होऊ शकली नाही. बुलढाणा, अकोला व नागपूर जिल्ह्य़ांत उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी झाली नाही. केवळ दहा टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत पोहोचले असताना कडक उन्हाच्या तडाख्यात सापडले आहे. उन्हाळी भात, भुईमुग ही पिकेही सुकून गेली आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गुरांना चारा मिळावा म्हणून कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्याने बऱ्यापैकी मक्याच्या पेरणी झाली. १९०० हेक्टरवर उन्हाळी बाजरीची पेरणी झाली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ांसह राज्यातील १७ जिल्ह्य़ांमध्ये उन्हाळी मका पीक घेण्यात येते. या हंगामात १२ हजार हेक्टरवर उन्हाळी मक्याची पेरणी झाला आहे. वाढत्या तापमानाची झळ मक्याला बसली आहे. नागपूर विभागात यावर्षी २७ हजार ८०० हेक्टरमध्ये उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. विदर्भात सर्वच जिल्ह्य़ांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्यावर पोहोचल्याने पिके वाळू लागली आहेत. या आठवडय़ात तापमानाचा पारा दररोज नवा उच्चांक गाठत आहे. रोहिणी नक्षत्राच्या तोंडावर सूर्य आणखी आग ओकत आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पावसाची शक्यता नाही. जीवाची लाही करणाऱ्या तापमानामुळे विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्य़ांतील केळी व संत्रा बागा सुकू लागल्या आहेत. पिके व फळांच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.