उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून हलकासा दिलासा मिळाला असला तरीही चंद्रपूरकरांची मात्र यातून सुटका झालेली नाही. गेले दोन दिवस चंद्रपूरकरांनीही सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण अनुभवले, पण सोमवारपासून पुन्हा पाऱ्याने ४७ अंश सेल्सिअस पार केले. त्यामुळे नवतपाच्या काळात पारा ४८ अंशावरही जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २००७ मध्ये याच नवतपाच्या काळात चंद्रपूरने ४९ अंश सेल्सिअस तापमान अनुभवले होते.
सध्या २५ मे ते २ जून हा काळ हवामान क्षेत्रात नवतपाचा काळ म्हणून गणला जातो. या काळात मध्य भारतात सर्वाधिक उन्हाचा तडाखा नागरिक अनुभवतात. उन्हाची ही लाट विदर्भापासून तर मध्यप्रदेशापर्यंत पसरत जाते आणि पारा ४८-४९ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचतो. २ जून २००७ रोजी चंद्रपुरातील  पारा ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. हा आजतागायतचा मध्यभारतातला नवतपाच्या काळातला उच्चांक आहे. सोमवार, २५ मे रोजी दुपारच्या सुमारासच तापमानाने ४७ अंश गाठल्याने तापमान आणखी वाढण्याची दाट शक्यता हवामानाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे. येथील अभ्यासक व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. योगेश्वर दुधपचारे यांनीसुद्धा यंदा नवतपा चांगलाच तापणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी या नऊ दिवसात पावसाची शक्यतासुद्धा त्यांनी वर्तवली आहे.
पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती उद्भवल्यानंतर विदर्भातही हे वारे येतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र, या वाऱ्यांनी दिशा बदलली आणि पावसाची शक्यता मावळली. तरीही रविवारी दुपारच्या सुमारास नागपूर शहरात आकाशात ढग दाटून आले आणि अवघे १०-१५ मिनिटे शहरातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरणाने पारा घसरला तरीही चंदपूर शहरात मात्र तो वाढतच आहे.
काय आहे नवतप?
नवतपाची ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. रोहिणी नक्षत्रात सूर्याने प्रवेश केल्यानंतर सूर्य डोक्यावर असतो. त्यामुळे या काळात उन्हं चांगलेच तापते. कधीकधी रोहिणी नक्षत्रात पाऊस किंवा वादळी वाऱ्यांचीही शक्यता असते. मात्र, बरेचदा तापमान या काळात सर्वाधिक म्हणजे चढलेलेच असते.