भारतातील संशोधनातून शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. एखादे संशोधन केल्यानंतर त्याचे प्रकाशन करून येथेच न थांबता झालेला संशोधनाचा एकत्रितरीत्या वापर करावा, यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणीवर मात होऊ शकेल,’ असे प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे महाराष्ट्र विज्ञान परिषद, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचा चिरंतन विकास विचार’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. काकोडकर म्हणाले, ‘शाश्वत विकासाला भारतात व इतर देशात महत्त्व आहे. याकरिता समाजोपयोगी पडतील अशाच प्रकारचे संशोधन होणे गरजेचे आहे. भारताच्या संशोधनास ऊर्जितावस्था येण्याकरिता परदेशातील भारतीय संशोधकांनी भारतात परत यावे. त्याच्या ज्ञानाचा वापर भारतासाठी करावा.’ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डब्ल्यू. एस. गाडे म्हणाले, संशोधनामध्ये छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर लक्ष असणे गरजेचे आहे. विद्यापीठ व इतर भागात होणारे संशोधन महत्त्वाचे आहेत. अध्यक्षीय भाषणात कुलगरू डॉ. पवार म्हणाले, शाश्वत विकासाचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सहभाग महत्त्वाचा आहे. उच्च शिक्षणासाठी औद्योगिक भूमिका आणि समाज यांचा उपयोग होतो. शाश्वत विकासासाठी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली.महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. जी. डी. यादव म्हणाले, शाश्वत विकास करण्याकरिता अनेक आव्हाने आहेत. चांगले उत्पादन, लोकसंख्या कमी करणे, जीवनशैली सुधारणे, इंधनातून सल्फरचा वापर कमी करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर पुरेपूर करणे, तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर करणे, मुबलक व पुरेसे अन्नधान्याचे उत्पादन करणे, रोगांवर संशोधन करून मात करणे, संशोधन वाढवणे या प्रकारची अनेक आव्हाने पूर्ण केल्यानंतर नक्कीच शाश्वत विकास होईल. दुपारच्या सत्रात फळ व भाजीपाला शेतीमालाची प्रत सुधारणे, समुद्रीय खाद्यपदार्थ आणि वनस्पती गूळ प्रक्रिया, शीतप्रक्रिया व साठवणूक या यशस्वी प्रकल्पावर प्रा. स्मिता लेले प्रा. भास्कर थोरात, प्रा. एस.एम. भागवत, प्रा. नरेंद्र शहा (मुंबई) यांनी चर्चा केली.स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक व जीव-रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.पी. गोिवदराव यांनी केले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, व्ही.व्ही. महाजनी, डॉ. ज्योती जाधव तसेच विभागप्रमुख, प्राध्यापक व तज्ज्ञ उपस्थित होते.