गांधीजींच्या नंतर सामाजिक चळवळ निष्ठेने करणारे नेल्सन मंडेला हे जगातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्याच्या लढय़ासाठी त्यांनी जगात नवा आदर्श निर्माण केला होता. या महान व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने केवळ दक्षिण आफ्रिकेचीच नव्हे, तर जगाची हानी झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नेल्सन मंडेला भारतात आले, त्या वेळेस आपली त्यांच्याशी भेट झाली होती. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमास आपण उपस्थित होतो अशी आठवण विखे यांनी सांगितली. मंडेला हे स्पष्ट विचारसरणीचे होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटीविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. त्यामुळेच ते मोठे सामाजिक क्रांती करू शकले. ते शांततेच्या सच्चे पुरस्कर्ते होते. दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाल्यावर त्यांनी काही काळ राष्ट्राध्यक्षपदही भूषविले. त्यांनी जगामध्ये शांततेचा संदेश पोहोचविला. या महान नेत्याच्या निधनामुळे देशाची व जगाची हानी झाली आहे असे ते म्हणाले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही मंडेला यांना श्रद्धांजली वाहिली.