भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा बंदुकीच्या गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी तिघांना मंगळवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. गतवर्षी जानेवारी महिन्यात घडलेल्या खुनाच्या प्रकारात राजू विलास पोवार (वय ४९ रा.रमणमळा), श्रीधर अर्जुन शिंगटे (वय २७ रा.इंचनाळ, ता.गडहिंग्लज) व नामदेव पांडुरंग नाईक (रा.महागाव ता.गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून खुनात वापरलेली बंदूक,जिवंत काडतूस, एक रिकामी पुंगळी असा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या खुनाचा तपास करण्याचे आदेश राजारामपुरी पोलीस ठाण्याला दिले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार राजू वरक यांनी सहकाऱ्यांसमवेत या खुनाचा तपास केला. कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, चंदगड तालुका येथे फिरून आरोपींची माहिती मिळविली. मयत बाळासाहेब दादू पोवार (वय ४९ रा.कसबा बावडा) यांचा १२ जानेवारी २०१२ रोजी टेंबलाई रेल्वे फाटक येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. मयत पोवार हा केबल चालक होता.केबल जोडणी स्पर्धेच्या संघर्षांतून खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. प्रत्यक्षात खुनाचे धागेदोरे उलगडल्यानंतर तो भाऊबंदकीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेब पोवार याचा चुलत भावांशी भाऊबंदकीचा जुना वाद होता. कसबा बावडा येथील ६००चौ.फुटाच्या जागेच्या वाटणीवरून सतत भांडणे होत असत. बाळासाहेब हा चुलत भावाच्या घरातील महिलांना अश्लील भाषेत बोलून अपमानित करीत असे. त्याच्या मुजोरीला कंटाळून आरोपी राजू पोवार याने श्रीधर शिंगटे व नामदेव नाईक यांना खुनाची सुपारी दिली होती. या तिघांकडून बाळासाहेब याचा खून करण्यासाठी तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. अखेरीस गतवर्षी १२ जानेवारी रोजी टेंबलाई फाटकाजवळ निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी या तिघांनी बंदुकीतून गोळी झाडून बाळासाहेब पोवार याचा खून केला होता.