कापसाच्या १०० गाठी माल घेऊन जाणाऱ्या ट्रकसह बेपत्ता झालेल्या चालकाच्या तीन साथीदारांना चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील विठ्ठलदास गोवर्धनदास जिनर्समधून १३ ते १६ एप्रिल या कालावधीत कापसाच्या १०० गाठी चालक इम्रान हा मालमोटारीतून अहमदाबाद येथील अरविंद मिलमध्ये पोच करण्यासाठी निघाला होता. परंतु ठराविक वेळेत माल पोच न झाल्याने चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक डी. डी. गवारे, शामकांत सोमवंशी हे संशयितांच्या शोधात होते. मोबाईलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पहूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नाकाबंदी केली असता एका टाटा सफारीचा त्यांना संशय आला. या वाहनातील सुभाष नन्नावरे, विकास गोरे, सागर शिंदे (सर्व राहणार श्रीरामपूर) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना २९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन संशयित सापडले असले तरी इम्रान व माल भरलेला ट्रक अद्याप मिळालेला नाही.