आता पाऊस आला नाही तर पेरण्या कशा करायच्या, अशी चिंता लागलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत सोमवारी रात्री अनेक ठिकाणी पाऊस मुक्कामी आला. मंगळवारी दुपापर्यंत सरीवर सरी आल्या. हलक्या, मध्यम स्वरूपाच्या सरी दिवसभर पडल्याने सखल भागात पाणी साठले.
पावसाची शुभवार्ता अशी की, जायकवाडी जलाशयात काही अंशी पाणीपातळी वाढली. पण ती नगण्यच म्हणावी लागेल, असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात. मराठवाडय़ात झालेल्या पावसामुळे ‘पेत्रे व्हा’ असाच संदेश दिला. जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर आणखी मोठय़ा पावसाची गरज आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असे. मात्र, तो पेरणीयोग्य नव्हता. सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने पेरण्या करता येतील, असे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे – औरंगाबाद (२५.३०), फुलंब्री (१८), पठण (७.३०), सिल्लोड (३३.४०), सोयगाव (३७), कन्नड(३५.२३), वैजापूर (४८.४०), गंगापूर (४.३१), खुलताबाद (१०), एकूण पाऊस २२९ मिलीमीटर. त्याची सरासरी टक्केवारी २१.६६ आहे.