येथील टोलविरोधातील लढाई निर्णायक टप्प्यावर आली असताना महायुतीने सवतासुभा करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे आयआरबी कंपनीला मदत करण्यासारखेच असल्याचा आरोप ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. पत्रकात म्हटले आहे की, टोलविरोधातील कृती समिती ही सर्व पक्ष, संघटना यांच्या एकीतून तयार झाली आहे.
कृती समितीने गेल्या चार वर्षांपासून नेटाने दिलेल्या लढय़ानेच सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. हे यश टोलविरोधी कृती समितीच्या एकीचे आहे. मात्र ८ फेब्रुवारी रोजी महायुतीने सवतासुभा मांडल्याने टोल आंदोलनात फूट पडली आहे. यामुळे महायुतीने घेतलेला निर्णय जनतेच्या हितासाठी मागे घेण्यात यावा, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.
टोलबाबत असणारे मतभेद विसरून जिल्ह्य़ाचे मंत्री, नगरसेवक यांनी या आंदोलनात उडी घेतली आहे ही बाब अभिनंदनीय आहे. सर्व मतभेद विसरून टोलरूपी राक्षस कायमचा हद्दपार करणे गरजेचे असल्याचे पत्रकाद्धारे सांगितले आहे. अध्यक्ष उदय लाड, सुभाष कापसे, सलीम पाच्छापुरे, प्रशांत वाघमारे, संजय गुदगे, किरण कांबळे आदींनी पत्रकावर स्वाक्षरी केल्या आहेत.