नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर व रेल्वे डब्यांमध्ये भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या भिकाऱ्यांच्या उपद्रव्यांमुळे प्रवाशी हैराण झाले आहे. रेल्वे स्थानकात असलेल्या सुरक्षा यंत्रणेकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे, ऐरोली, घणसोली, तुर्भे, सानपाडा रेल्वे स्थानकांमध्ये गेली कित्येक वर्षे भिकारी आपले बस्तान मांडून असल्याचे पाहावयास मिळत आहे. रेल्वे स्थानकांवर विश्रांतीसाठी बसवण्यात आलेल्या बाकडय़ावरही या भिकांऱ्यानी आपला कब्जा केला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना उभे राहून ताटकळत रेल्वेची वाट पाहावी लागते. काही दिवसांपासून नवी मुंबईतील सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या हायटेक रेल्वे स्थानकांमध्ये उघडय़ावर झोपणे, जेवण करणे असे प्रकार भिकाऱ्यांकडून होत आहेत.
बाकडय़ावर बसणाऱ्या जोडप्यांकडून जबरदस्तीने भीक घेण्याचा प्रकारही सर्रासपणे येथे घडत आहेत. भिकाऱ्यांमध्ये लहान मुलांचा मोठय़ा प्रमाणात वावर असून ती येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलच्या दरवाज्याजवळ उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडून पैशाची मागणी करीत असतात. भीक मिळण्याच्या आशेने फलाटांवर रेल्वेच्या मागेही ही मुले धावतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रकार येथे घडत असतात. भिकाऱ्यांचा प्रवास एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत चालत असून मध्येच कोणत्याही स्थानकांवर त्यांचे बस्तान असते. हे भिकारी रेल्वेच्या शेवटच्या डब्याजवळ घोळक्याने बसलेले असतात. महिला प्रवाशांनादेखील त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. भीक म्हणून पैसे न दिल्यास अश्लील शब्द उच्चारून प्रवाशांशी गैरवर्तन करतात. या सर्व प्रकारांमुळे रेल्वे स्थानकांना गलिच्छपणा प्राप्त झाला आहे. हे सगळे किळसवाणे प्रकार पाहात प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. हे सर्व प्रकार नजरेसमोर घडत असतानाही रेल्वे स्थानकातील सुरक्षा कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून हाते आहे.रेल्वे स्थानकावंरील भिकाऱ्यावर पोलीस व आरपीएफ असे दोघेही कारवाई करीत असतात. रेल्वे स्थानकांवर भिकारी भीक मागत असल्यास त्यांना पकडून न्यायालयापुढे हजर करण्यात येते. तेथे त्यांच्याकडून दंड आकारून त्यांना सोडण्यात येते. तर अल्पवयीन मुले भीक मागत असल्यास त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात येते, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
मी रोज ठाणे-वाशी लोकलने प्रवास करीत असतो. रोजच हे भिकारी प्रवाशांना त्रास देत असतात. भिकाऱ्यांना भीक न दिल्यास अश्लील भाषेत शिव्या देऊन प्रवाशांशी गैरवर्तन करतात. जोडप्यांची तर भिकारी पैसे घेतल्याशिवाय सुटकाच करत नाही. रेल्वे स्थानकांवर भिकाऱ्यांच्या दहशतीचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. भिकारी रेल्वे स्थानकांवर येतातच कसे, असा प्रश्न पडतो. प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
सागर कांबळे, रेल्वे प्रवासी