जिल्हय़ात चालू वर्षांत शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत ५१ लाख १२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कमी पाऊस हे या मागील कारण सांगितले जाते.
गेल्या वर्षी वृक्षलागवड कार्यक्रमाचा गाजावाजा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी पाऊस झाला. शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यासाठी एक दिवसाचे वेतन दिले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जमलेला लाखोचा निधी वृक्षलागवडीच्या खड्डय़ात गेला. चालू वर्षी शतकोटी योजनेंतर्गत वृक्षलागवडीचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आले. जिल्हय़ातील ५६५ ग्रामपंचायतींतर्गत ५१ लाख १२ हजार लागवडीचे उद्दिष्ट ठरले. सुमारे ४३४ रोपवाटिकांमधून ६८ लाख ८ हजार रोपे उपलब्ध होणार होती. पाण्याअभावी १३ लाख ६३ हजार रोपे सुकल्याच्या नोंदी सरकारदफ्तरी आहेत. सार्वजनिक ठिकाणी शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत, शेतीवरील बांध आदी ठिकाणी २० लाख ४४ हजार रोपे लागवडीसाठी पुरविल्याच्या, तर २५ लाख ५१ हजार रोपे शिल्लक असून ८ लाख ५ हजार ३ रोपांची लागवड झाल्याच्या नोंदी आहेत.