गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील एकतिसावा लेख.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून मूल्यमापनाच्या निकषात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल तंटे मिटविणे आणि नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे या तीन गटांनुसार गावांच्या कामांचे मूल्यमापन होत असल्याने प्रत्येक गावाचा तंटामुक्त पात्रतेसाठी आवश्यक ते गुण मिळविण्याचा प्रयत्न असतो.सलग सहा वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेसाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करून विकास प्रक्रिया गतिमान करण्याकरिता ही तत्त्वे महत्त्वाची ठरतात. मोहिमेच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक अन् पद्धती याची सखोल अभ्यासाद्वारे मांडणी करण्यात आली आहे. त्यानुसार गाव तंटामुक्त झाल्याचा अहवाल तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व निमंत्रक यांच्या स्वाक्षरीने पोलीस ठाणे प्रमुख व तहसीलदार यांच्याकडे पाठविला जातो. त्यानंतर संबंधितांच्या स्वाक्षरीने तंटामुक्त गावांची यादी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठविली जाते. पुढे ही यादी शासन, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (परिक्षेत्र) यांना पाठविली जाते. वर्षांच्या अखेरीस गावांनी मोहिमेंतर्गत केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी २०० गुण ठेवण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे यासाठी ८० गुण असून त्यापैकी किमान ५६ गुण मिळविणे क्रमप्राप्त ठरते. तर दाखल तंटे मिटविणे यासाठी १०० पैकी ७० तर नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविण्यासाठी २० पैकी १४ गुण मिळविणे आवश्यक आहे. तंटामुक्त गाव जाहीर करण्यासाठी तिन्ही गटांत आवश्यक गुणांची बेरीज १४० येत असली तरी तंटामुक्त पात्रतेसाठी १५० गुण मिळविणे आवश्यक ठरते. एखाद्या गावात तंटेच नसतील किंवा नव्याने तंटे निर्माण झाले नाहीत तर त्या तंटय़ांच्या प्रकारातील पात्रतेसाठी आवश्यक गुण दिले जातात. म्हणजे एकूण २०० पैकी किमान १५० गुण प्राप्त करणारे गाव तंटामुक्त गाव समजले जाते.शासनाने आखून दिलेल्या निकषांनुसार तंटामुक्त गाव समिती पात्रतेसाठी आवश्यक असणारे किमान गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करते. ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर करून समिती तंटय़ांचे निराकरण करण्यास सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कामकाजाचा अहवाल पोलीस ठाण्यास दिला जातो. पोलीस व शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने शासनाच्या इतर मार्गदर्शक तत्तत्वांची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते. जेणेकरून मूल्यमापनात पात्रता निकष पूर्ण करणे हेच तंटामुक्त गाव समितीचे प्रमुख लक्ष्य असते.