उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्यासह दिल्ली येथे राष्ट्रपतींची भेट घेऊन निमंत्रण दिले.
राष्ट्रपती मुखर्जी यांच्या समवेत झालेल्या चर्चेत विद्यापीठाच्या वाटचालीची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रयोगशाळा ते जमीन व प्रयोगशाळा ते उद्योग या उपक्रमांसोबतच विद्यापीठाच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील प्रगतीविषयी राष्ट्रपतींना अवगत करण्यात आले. नंदुरबार येथे उभारण्यात येणारी आदिवासी प्रबोधिनी ही देशातील पहिलीच अशा प्रकारची प्रबोधिनी ठरणार असून, या अभिनव प्रकल्पाविषयीची माहितीदेखील राष्ट्रपतींना देण्यात आली.
आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाकडून होत असलेल्या उपक्रमांची माहिती ऐकून राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन, आदिवासी प्रबोधिनीचे संचालक प्रा. आर. एच. गुप्ता या वेळी उपस्थित होते.