पाणी वापराचे प्रमाण जसे वाढत गेले तशी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियानातंर्गत आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. उद्घाटन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले. यावेळी आमदार डॉ. खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. िशदे, जिल्हा कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय अधिकारी दिलीप सावरकर, तहसीलदार संजय पवार प्रामुख्याने उपस्थित होते. देशमुख म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी जलसंपदेचे महत्त्व ओळखून भविष्यातील जलसंकट निवारण्याच्या समस्येवर उपाययोजना केल्या म्हणूनच या अभियानाला त्यांचे नाव देण्यात आले. शेतकरी बांधवांनी खरीप पिकासोबत रब्बी पिकांचेही उत्पादन घ्यावे, तसेच कृषी संलग्न व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, जलसंधारणविषयक जागरूकता निर्माण करणाऱ्या स्टीकरचे प्रकाशन अनिल देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. खुशाल बोपचे यांनी जिल्ह्य़ाच्या विकासाच्या दृष्टीने एकात्मिक पाणलोट जनजागृती अभियानाचे महत्त्व सांगितले. तसेच याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिरांची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविकेत जिल्हा कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी २०१२-१३ मधील पाणलोट संदर्भात मंजूर प्रकल्पाची माहिती, बांध बंधिस्ती, पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचे प्रकार, सिमेंट बंधारे, पाणी साठवण्याच्या ऐतिहासिक पद्धती, श्री पद्धतीने भाताची लागवड, मासेमारी, पशुपालन याबाबत पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. संचालन देवरी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले, तर आभार आमगाव तालुका कृषी अधिकारी डी.एम. तुमडाम यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.