शेतीला जोडधंद्याची जोड दिल्याशिवाय विकास होत नाही, हे आता विदर्भातील शेतक ऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. आर्थिक विकासासाठी शेतीला पूरक विविध जोडधंदे शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन अशा कितीतरी व्यवसायांची नावे सांगता येतील. परंतु, मधमाशी पालन व्यवसायाला विदर्भात मोठा वाव असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या जोडधंद्यापासून उत्पन्न मिळविण्यासाठी होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत.मधमाशी म्हटले की प्रत्येकाला भीती वाटते, पण विदर्भात मधमाशी पालन हा उद्योग शेतकऱ्यांना फलदायी ठरू शकतो. विदर्भात अजूनही या उद्योगाला चांगला वाव आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतक ऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षणही दिले जाते. महाबळेश्वर येथील मधुक्षेत्रिक व्ही.एम. कुंभरे यांनी साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रात गेल्या महिन्यात मधमाशी पालन व्यवसायाविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. सध्या या केंद्रात २९ मधमाशी पेटय़ांमधून पालन, मधमाशांची पैदास आणि वसाहती वाढविण्याचे काम सुरू आहे. शेतक री व ग्रामीण तरुण, तरुणींना हा व्यवसाय जाणून घ्यावा म्हणून प्रात्यक्षिके दिली जात आहेत. मधमाशी पालन पेटीला मेणपत्रे लावली की त्यावर निसर्गातील मधमाशा आकषित होतात. या केंद्रातून ४५ शेतक ऱ्यांनी या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले घेऊन मधमाशी हाताळणे, मेणपत्रे लावणे आदी कामे स्वत:हून केली आहेत. त्यांच्यातील मधमाशांबाबतची भीती आता दूर झाली आहे. जंगलामध्ये विविध वनस्पती, पिके, पाण्याचे स्रोत भरपूर प्रमाणात फुलोरा उपलब्ध आहे. पावसाळ्यानंतर या व्यवसायाचे काम वेगात सुरू होईल. जंगलात फुलोरा राहत असल्यामुळे मधमाशी पालन उद्योग फलदायी राहील, असे साकोली येथील कृषी विकास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.मधमाशांनी केलेल्या परागीकरणामुळे पीक-उत्पादन तर वाढते शिवाय उत्पादनाची प्रतही सुधारते. मध व मेणही मिळत असल्याने ‘मधमाशा वाचवा शेती वाचवा’ हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. भारतीय आरोग्यशास्त्रातही मधाला फार मोलाचे स्थान मिळालेले आहे. आजीच्या बटव्यातला अविभाज्य घटक असलेला मध आरोग्यदायी आहे. पोटाचे आजार, खोकला घालविण्यासाठी व शरीर सुदृढ ठेवण्यासाठीही मध फारच उपयुक्त आहे. नैसर्गिक गोडव्याामुळे मध सर्वाच्याच आवडीचा आहे. या व्यवसायाला मोठे भांडवल लागत नाही. अधिक खर्चही करावा लागत नसल्याने व्यवसाय शेतक ऱ्यांच्या अत्यंत फायद्याचा आहे.