चतुरस्त्र अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांच्या निधनाने विदर्भातील नाटय़सृष्टीत शोककळा पसरली असून एक मागदर्शक आणि वैदर्भीय कलावंतांना सांभाळून घेणाऱ्या ज्येष्ठ कलावंत असल्याची भावना त्यांच्या सान्निध्यात आलेल्या अनेक कलावंतांनी आणि काही संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. स्मिता तळवलकर यांचे विदर्भाशी वेगळे नाते होते, ज्या ज्यावेळी त्यांना नागपूरला आमंत्रित करण्यात आले होते तेव्हा त्यांनी कधीच नकार दिला नाही. त्यामुळे त्या प्रत्येकाला आपल्या वाटत होत्या आणि त्यांच्याबद्दल आदर होता. गेल्या काही वषार्ंपासून कर्करोगाशी झुंजत असतानाही अनेक वेळा कार्यक्रमाच्या किंवा एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने विदर्भात येऊन त्या रसिकांशी संवाद साधत असत. मात्र, आपल्याला इतका मोठा आजार आहे हे त्यांनी कधीच समोर आणले नाही. स्पष्ट वक्तया, पटल नाही तर त्याच्या विरोधात बोलणाऱ्या आणि बोलताना समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून त्याला नंतर प्रेमाने समजून सांगणाऱ्या स्मिताताई नागपूरकरांतील अनेक कलावंतांनी अनुभवल्या आहेत. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या प्रमुख कार्यवाह पदाची जबाबदारी स्मिता तळवळकर यांच्याकडे असताना त्यावेळी नागपूर शाखेत नवीन सदस्यांवरून पदाधिकारी आणि कलावंतांमध्ये वाद सुरू होता. त्या संदर्भातील मुंबईला दोन्ही बाजूने पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यावर त्यांनी नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना प्रथम पत्र पाठवून आणि त्यानंतर प्रत्यक्ष खडसावून कोणाची मनमानी चालणार नाहीत असा इशारा दिला होता. नाटय़ परिषदेमध्ये कुठलाच वाद नको यादृष्टीने त्यांनी सगळ्यांची समजूत घातली होती. चित्रपट आणि नाटकाच्या निमित्ताने त्या अनेकदा नागपूरला आल्या असताना त्या प्रसार माध्यमांशी आणि कलावंतांशी संवाद साधत असे.दिवं. चित्रपट दिग्दर्शक संजय सुरकर यांच्या माध्यमातून त्या नागपूरशी इतक्या जुळल्या की विदर्भातील कलावंतांना चित्रपट आणि मालिकांमध्ये स्थान मिळावे यासाठी त्या सतत धडपड करीत होत्या. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पहिल्या आठवडय़ात विदर्भ साहित्य संघ आणि आधार या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लेखिका संमेलनात दृकश्राव्य माध्यमातील स्त्रीप्रतिमा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या आणि बहुधा तो त्यांचा नागपूरचा शेवटचा कार्यक्रम ठरला. त्या कार्यक्रमात जवळपास एक तास त्यांनी परखड विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली होती. स्मिता तळवळकर यांच्या आठवणींना उजाळा देताना शुभदा फडणवीस म्हणाल्या, धानोरा येथे विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संमेलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी डॉ. अभय बंग यांच्या शोधग्राममध्ये थांबल्या असताना तेथील सेवा कार्यात त्या सहभागी झाल्या होत्या. अतिशय साधी, मनमिळावू आणि स्पष्ट बोलणारी म्हणून तिचा लौकिक होता. दिलखुलास असे तिचे व्यक्तिमत्त्व होते. लेखिका संमेलनाच्यावेळी भोजन विभागात जाऊन तिने पाटोडीचा आस्वाद घेतला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रमोद भुसारी म्हणाले, नियामक मंडळाचे सदस्य असताना आणि त्यापूर्वी प्रमुख कार्यवाह असताना त्यांच्याशी अनेकदा चर्चा होत असे. नागपूरकर असलेल्या दिवं. संजय सुरकर यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यामुळे त्यांचे विदर्भाशी वेगळे नाते होते. नाटय़ परिषदेमध्ये कुठलेही निर्णय घेताना त्यांनी मदत केल्याचे सांगून विदर्भ आणि मुंबईला जोडणारा दुवा निखळला असल्याचे भुसारी म्हणाले. स्मिता तळवळकर यांच्यासोबत जवळपास दहा वर्षे नियामक मंडळात काम केले. त्या साहसी आणि उमदे व्यक्तीमत्त्व होते. ज्या गोष्टी पटत नव्हत्या त्या विषयी त्या परखडपणे बोलून त्यांनी अनेकदा कानउघाडणी केली असली तरी त्यांनी विदर्भातील कलावंतांवर प्रेम केले आहे. त्यांच्या मागे चित्रपट, मालिका आणि संसार असा सगळा व्याप असताना त्या नाटय़ परिषदेच्या कामासाठी वेळ देत होत्या. कलावंतांसाठी मागदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्या असे सांगून परिषदेचे माजी सहकार्यवाह दिलीप ठाणेकर यांनी भावना व्यक्त केल्या.