बेभरवशाच्या हवामानामुळे शेतीची समीकरणे बदलली असताना विदर्भातील शेतकरी अद्यापही पारंपरिक शेतीच्या चक्रव्यूहात अडकून पडल्याचे चित्र आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेश म्हणून बदनाम झालेल्या विदर्भातील शेतकरी शेतीच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि व्यापारी तत्त्वावरील शेतीचा अंगीकार करीत नसल्याने सातत्याने नुकसानीत राहत आहे. शेतीपूरक जोडधंद्यांकडेही शेतक ऱ्यांचे दुर्लक्ष होत असून कापूस, संत्रा, सोयाबीन, गहू, हरभरा तसेच काही पट्टय़ात धान, ऊस लागवडीतून उत्पन्न मिळवण्याची वर्षांनुवर्षे सुरू असलेली पारंपरिक शेतीपद्धती यासाठी जबाबदार ठरत आहे. निसर्गाचा प्रकोप, पावसाची हुलकवणी, रोगांचा प्रादुर्भाव आणि कर्जाचा डोंगर या दुष्टचक्रात शेतकरी सापडला असला तरी काही भागातील शेतक ऱ्यांनी मात्र, नव्या पिकांच्या लागवडीवर भर देऊन भरघोस उत्पन्न मिळवत क्रांती घडविली असून कमीत कमी पाण्याचा वापर आणि सेंद्रिय खतांच्या वापरातून कोरडवाहू शेतीतंत्रातही नफा मिळविता येऊ शकतो, हे सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. गेल्या वर्षभरात नागपुरात अॅग्रो व्हिजन, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळा, अॅग्रोवेस्ट कार्यशाळा अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतक ऱ्यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न झाला. यातील एकंदर निष्कर्षांवरून शेतक ऱ्यांना नव्या तंत्रज्ञानातील शेतीव्यवस्थेकडे जाण्याची इच्छा असली तरी प्रत्यक्षात यातील बारकावे समजावून सांगणारी व्यवस्था तोकडी पडत आहे. तज्ज्ञांच्या मते शेतीला जोडधंद्याची जोड देण्यासाठी आर्थिक स्रोतांचे नियोजन करताना असंख्य अडचणी येत आहेत. विदर्भात मोठय़ा प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांची कमतरता असून मालाची वर्गवारी तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणा आवश्यक झाली आहे. निर्यातशून्य धोरणाने शेतक ऱ्यांना माल विकण्यासाठी एकखिडकी बाजारपेठा उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातील पारंपरिक पीक असलेल्या कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक असतानाही सर्वात कमी उत्पादकता महाराष्ट्राची आहे. कापूस उत्पादकांप्रमाणे संत्रा आणि ऊस उत्पादकांचेही हाल सुरू आहेत. वातावरणात वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे संत्री, आंब्याचा दुबार मोहोर व फळांची गळती याचा आर्थिक फटका बसलेला शेतकरी पार कोलमडून पडत आहे. दरवर्षी हीच स्थिती उद्भवत असल्याने शेतक ऱ्यांनी व्यापारी म्हणून शेती करून उत्पन्न व खर्चाचा ताळामेळ बसविण्याची आवश्यकता असून ‘जे विकते तेच पिकवा’, या तत्त्वानुसार शेती व्यवसाय केल्यास विदर्भातील शेती टिकाव धरू शकेल, असे कृषीतज्ज्ञांनी म्हटले आहे.