शिक्षण हक्क कायद्यामुळे सर्वाना शिक्षण देणे बंधनकारक आहे. सोबतच दर्जेदार शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या योजनांमध्ये आपल्याही गावाचा क्रमांक कसा लागेल व जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या साठी गावकऱ्यांनी मार्गदर्शक बनावे, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
भारसवाडा येथे आरोग्य शिक्षण, पोषण जनजागरण व जनसंवाद मोहिमेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सरपंच संजय भोसले, उपसरपंच सखाराम धबाले, जि.प.चे माजी सभापती धोंडीराम चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री आदी उपस्थित होते. मंत्री खान म्हणाल्या, की शालेय स्तरावरील पाया भक्कम करणे गरजेचे आहे. त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते की नाही, शिक्षक नियमित उपस्थित राहतात का, यासाठी गावात शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी प्रयत्न करावे. आपल्या गावातील आरोग्य संस्थेत मिळणारी सेवा कशी आहे, आरोग्य कर्मचारी उपलब्ध होतात का, या गोष्टींवरसुद्धा गावकऱ्यांनी लक्ष ठेवावे.
खान यांनी पोखर्णी, सुरपिंप्री, आंबेटाकळी, माळसोन्ना आणि दैठणा या गावांना भेटी देऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी, जि.प. शाळा आदींची पाहणी केली. या वेळी या गावांचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.