विज्ञान, तंत्रज्ञान विदेशाकडून घ्यावे व बदल्यात जगाला अध्यात्म द्यावे, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. त्यांचे विचार जगाला तारणारे आहेत, असे मत प्रा. प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले.
भारत जागो दौडच्या समारोपप्रसंगी देशमुख बोलत होते. स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे सर्वधर्म परिषदेत जे ऐतिहासिक भाषण केले त्याच्या स्मरणानिमित्त भारत जागो दौडचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.
युवकच देशाचे परिवर्तन करू शकतील असा विश्वास व्यक्त करून देशमुख म्हणाले, प्रत्येकाने स्वत:ला विवेकानंद समजून देशाचे भवितव्य बदलण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातील औसा रस्त्यावरील कल्पतरू मंगल कार्यालयापासून दौडीस प्रारंभ झाला. याप्रसंगी महापौर स्मिता खानापुरे, डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. राजेश पाटील, नरसिंग झरे, प्रकाश पाठक, वैजनाथअप्पा लातुरे उपस्थित होते.
शहराच्या मुख्य रस्त्यावरून नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकापर्यंत दौड झाली. या दौडीमध्ये शहराच्या दहा शाळांतील व सात महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दौडचे संयोजन विवेकानंद सार्धशती समारोह समितीचे जिल्हा संयोजक अतुल ठोंबरे यांनी केले.