नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उरणमधील मतदारांनी लढवलेली शक्कल लोकसभेच्या मतदानासाठी वापरण्यात येणार आहे. निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार पुन्हा निवडणुकीच्या काळातच समोर येतो. अनेक छोटय़ा-छोटय़ा कामासाठी नागरिकांना त्याच्याकडे हेलपाटे मारावे लागतात. यावर उरणकरांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. निवडणुकीत एकगठ्ठा मतदान देतो, त्या बदल्यात हौसिंग सोसायटींमधील कामे आणि युवक मंडळाला मदत देण्याची मागणी केली जात आहे. यामुळे एकापेक्षा अधिक उमेदवारांकडून मदत मिळत आहे.
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग उरणकरांनी केला होता. आता लोकसभेच्या निवडणुकीत या प्रयोगाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. निवडणूक आल्यानंतरच फक्त राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते दारापर्यंत येतात, निवडणूक झाली की,आम्हाला विसरतात,आमच्या समस्या आमची कामे पाच वर्षे तशीच राहतात.
त्यामुळे उमेदवारांना मते हवी असतील तर त्यांनी पहिली काही कामे करून द्यावीत तरच आम्ही मतदान करू  अशा मागण्या मतदारांकडून केल्या जात आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांच्या वेळी उमेदवारांकडून पाण्याच्या टाक्या, टेरेसवर छप्पर, बििल्डगला रंगरंगोटी आदी कामे करून घेण्यात आल्याची उदाहरण आहेत.
तरुण मंडळासाठी एखादी सोय किंवा मोठी रक्कम देणगी म्हणून दिल्यास तरुणांची एकगठ्ठा मते देऊ अशा प्रकारच्या तडजोडी यापूर्वीच्या निवडणुकीत झाल्याने अशा तडजोडी या लोकसभा निवडणुकीत व्हाव्यात यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र त्यामुळे पाच वर्षे निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्रश्न विचारण्याचाच हक्क गमावून बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा अनुभव अनेक मतदारांना यापूर्वी आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी मर्यादित असलेली प्रथा आता लोकसभेच्या निवडणुकीत येऊ पाहात असल्याबद्दल जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.