ठाणे परिसरात तरुणांनाही लाजविणाऱ्या उत्साहात ज्येष्ठ नागरिकांनी मोठय़ा संख्येने सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. अंबरनाथ येथील रघुनाथ टाकळकर आणि शशिकला टाकळकर या नव्वदी पार केलेल्या  दाम्पत्याने खास पुण्याहून येऊन गुरूवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. अंबरनाथ येथील साई विभागातील मतदान केंद्रात रांग लावून त्यांनी मतदान केले. शशिकला टाकळकर ९३ तर रघुनाथ टाकळकर ९९ वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या आजवरच्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये रघुनाथ टाळकरांनी मतदान केले आहे. आताही ९९ व्या वर्षी १६ व्या लोकसभेसाठीही मतदान करून त्यांनी तरुण पिढीसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.
त्याचप्रमाणे मूळ अंबरनाथकर पण सध्या मुलुंड येथे राहणारे ८६ वर्षीय प्रा. सत्यसंध बर्वे यांनीही आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. शहरातील आणखी एक ज्येष्ठ नागरिक ९३ वर्षीय वसंतराव देशपांडे यांनीही सकाळीच मतदान केले.