सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविल्यामुळे राज्याला एक प्रकारे सांस्कृतिक धक्का बसल्याचे चित्र रंगविले जात असले तरी ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली, मुलुंड यांसारख्या उपनगरांमध्ये गेली अनेक वर्षे डान्सबार झोकात सुरू होते आणि तेही पोलिसांच्या डोळ्यादेखत. सांस्कृतिक नगरीचा टेंभा मिरविणाऱ्या ठाण्यातील उपवन, लुईसवाडी, वैशाली नगर, कापूरबावडी, मानपाडा परिसर पूर्वीपासूनच ‘छमछम’चे अड्डे म्हणून ओळखले जातात. सात वर्षांपूर्वी लागू झालेल्या बारबंदीनंतरही हे चित्र आजतागायत बदललेले नाही. महापे-शीळ मार्गावरील मयूर बार, पनवेल येथील कपल-चांदनी, वाशीतील संडे-मधुबन, कोपरखैरणेतील मेट्रो-नटरंग हे डान्सबार मुंबई-पुण्यातील रंगेल रसिकांसाठी ‘मोक्याची’ ठिकाणे मानली जातात. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची भाषा करत पुण्याच्या राजकारणात ‘गोल्डन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असणारा बडा राजकीय आसामी वाशीत बारबंदी असतानाही रात्री उशिरापर्यंत कसा बार चालू ठेवायचा याचे किस्से आजही मोठय़ा चवीने चघळले जातात. त्यामुळे आर. आर आबांनी डान्सबार बंदीचा काढलेला फतवा कागदावर जरी कडक भासत असला तरी प्रत्यक्षात बार बंद होते कुठे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. महिनाभरापूर्वी दावडीनाका येथील मयूर बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून ६२ बारबालांना अटक केली होती. या ठिकाणी दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पनवेल येथील कपल बारवर मध्यंतरी ठाणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून काही कोटींची रोकड तेथून जप्त केली होती. ठाणे, कल्याण, शीळफाटा, नवी मुंबई, पनवेल अशा परिसरात मोठय़ा झोकात सुरू असलेल्या डान्सबारकडे स्थानिक पोलीस पद्धतशीरपणे कानाडोळा करू लागल्यामुळे या अवैध धंद्यांवर बाहेरून ‘आयात’ केलेले पोलीस छापे टाकू लागल्याने जिल्ह्य़ातील पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडू लागले होते. डान्सबार बंदीचा कायदा लागू असला तरी लेडीज सव्‍‌र्हिसच्या नावाखाली जवळपास सर्वच बारमध्ये सुरू असलेले अवैध धंदे अगदी बिनधोकपणे सुरू होते.
ठाणे, मुलुंड, नवी मुंबईत बारमालकांचे अड्डे

गृहमंत्रालयाने बारबंदीचा कायदा लागू केल्यानंतरही नवी मुंबईत रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी बार सुरू असायचे. जावेद अहमद यांनी येथील आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मात्र बारमालक धास्तावले आणि रात्री ११ वाजता हे बार बंद होऊ लागले. वाशी सेक्टर १७ परिसरात रात्री ११ नंतर बारबालांचे जथ्थे दिसायचे. कोपरखैरणे परिसरात नटराज नावाच्या बारमधील लेडीज सव्‍‌र्हिस स्थानिक पोलिसांना वाकुल्या दाखवत उशिरापर्यंत सुरू असायची. ठाण्यात अप्सरा, आम्रपाली, रेडबुल, पवन, टोपाझ, सिक्विन, शीतल, नाइट लव्हर्स, चक्रा या नावाने सुरू असलेल्या बारमध्ये लेडीज सव्‍‌र्हिसच्या नावाखाली छमछमही चालायचे. उल्हासनगर परिसरात पडक्या बिल्डिंगमध्ये सुरू असणारा धुरू नावाचा बार तर रात्री दीडनंतर सुरू व्हायचा. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर पनवेल परिसरात सुरू असलेल्या डान्सबारवर गेल्या सात वर्षांत अनेकदा छापे टाकण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. काही पोलीस निरीक्षकांना निलंबितही करण्यात आले होते. त्यानंतरही पनवेलची छमछम अव्याहतपणे सुरू राहिली. आबांच्या फतव्याने पहाटेपर्यंत सुरू असणारा धिंगाणा थांबला असला तरी गेल्या सात वर्षांत या बारमधील छमछम मात्र सुरूच होती.
निकालाआधीच जल्लोष..!!!

डान्सबार बंदीबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीचा निकाल आपल्या बाजूने लागेल याची चाहूल मुंबई, ठाण्यातील डान्सबार मालकांना सोमवारी रात्रीपासूनच लागली होती. न्यायालयात राज्य सरकारची बाजू काहीशी लंगडी असल्याचे सुरुवातीपासूनच बोलले जात होते. सोमवारी रात्री दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सुनावणीची चर्चाच रंगली होती. मुलुंड, ठाण्यातील काही बारमध्ये ‘विजया’चा जल्लोष सोमवारी रात्रीच साजरा करण्यात आला, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी वृत्तान्तला दिली. डान्सबारमधील मद्याचे दर इतर ठिकाणांपेक्षा अधिक असतात. मंगळवारच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर ग्राहकांना एका ‘पेग’वर दुसरा प्याला मोफत देऊन आनंद साजरा करण्याचे बेतही आखण्यात आले आहेत.
 हमारे तो भाग खुल गये..

डान्सबार फिर से शुरू होनेवाले है, हमरे तो भाग खुल गये! अशी प्रतिक्रिया डान्सबारमध्ये काम करणाऱ्या भारतीने (नाव बदलले आहे) दिली. डान्सबारवरील बंदी उठल्याचे वृत्त दूरचित्रवाहिनींवरून कळताच बारबालांचा मोठय़ा प्रमाणात वास्तव्य असलेल्या वागळे इस्टेट परिसरातील लोकमान्यनगर, सावरकरनगर येथील अनेक बारबालांनी आपला जल्लोष चक्क रस्त्यावर उतरून साजरा केला. एरव्ही स्वत:ची ओळख जगापासून लपवीत बारमध्ये काम करणाऱ्या या बारबालांनी रस्त्यावर उतरून भरपावसात आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी एक भला मोठा केक आणून तो कापण्यात आला. कायद्यानेच परवानगी दिल्याने आम्हीही आता ताठ मानेने जगू शकतो, आमच्या संसाराचा गाडा आता सुरळीत सुरू राहील, अशी प्रतिक्रिया काही बारबालांनी  व्यक्त केली.