उरण तालुका व येथील औद्योगिक परिसराला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उरणमधील पावसाची सरासरी कमी झाल्याने रानसई धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस हे भरून वाहू लागले होते. दोन लाखांची लोकसंख्या आणि शेकडो उद्योग असलेल्या व त्यामध्ये काम करणाऱ्यांची तहान भागविण्यासाठी उरणमध्ये दहा दशलक्ष घनमीटरचे रानसई हे एकमेव धरण आहे. धरणातील मातीचा गाळ मागील ४० वर्षांपासून काढलेला नसल्याने दहापैकी दोन ते तीन दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता घटली आहे. ती भागविण्यासाठी मोर्बे तसेच नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून उसणे पाणी घेऊन एमआयडीसी पाणीपुरवठा करीत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवी मुंबईच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीद्वारे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी रानसई धरणातील सात ते आठ दशलक्ष घनमीटर पाणी व जुलै महिन्यात भरणाऱ्या धरणातील वाहनारे पाणी यामुळे एक ते दीड दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होत होती. २०१४ ला उरणच्या रानसई धरण परिसरात ९०० मिलिमीटर पावसाची नोंद झालेली होती. त्यामुळे जुलै महिन्यातच धरण भरून वाहू लागले होते, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी दिली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ८६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या ११६ फूट उंचीपैकी ११५.५ फूट पाणी धरणात असले तरी धरणात होणाऱ्या इंचाइंचाच्या पावसामुळे धरण वाहू शकलेले नाही.