शहरातील नळपट्टी वसुलीची टक्केवारी केवळ ९ टक्के एवढी निचांकी आहे. शासकीय कार्यालयाकडेच तब्बल दीड कोटीची थकबाकी आहे. मनपाने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत ही बाब पुढे आली. या पाश्र्वभूमीवर उद्या (मंगळवार) नळपट्टी वसुलीची मोहीम मनपा उघडणार आहे. मालमत्ता व इमारत करवसुलीबाबत १० मार्चपासून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत मालमत्ता, पाणीपट्टी, इमारत करवसुली आदी विभागांतील करनिरीक्षक व बिल कलेक्टर यांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना वसुलीबाबत सूचना देण्यात आल्या. नळपट्टी वसुली केवळ ३ टक्के असल्याने आयुक्त सुधीर शंभरकर यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वाधिक थकबाकी शहरातील शासकीय कार्यालयांकडे आहे. तब्बल दीड कोटी रुपये या कार्यालयाकडे थकीत आहेत. वसुलीमध्ये सुधारणा न केल्यास वेतनवाढ कायमची बंद करण्यात येईल. प्रसंगी निलंबनासही सामोरे जावे लागेल, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मालमत्ता, पाणीपट्टी आणि इमारत कर थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी बिल कलेक्टरकडे जमा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त शंभरकर यांनी केले. बैठकीला कर अधीक्षक सदाशिव नगरसाळे, ए. डी. देशमुख, मुकुंद मस्के, मालमत्ता निरीक्षक समीयोद्दीन, बी. एन. तिडके, सी. एल. पवार, पी. ए. पालकर, जलील अहमद खान, राम जाधव आदी उपस्थित होते.