शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये गायी-म्हशी-शेळ्या-मेंढय़ा पालन, एरंडीची शेती, रेशीम कीडे पालन, अंडीपुंज निर्मिती केंद्र, गांडूळ खत निर्मिती, अ‍ॅग्रोवेस्ट युनिट असे पूरक उद्योग करता येणे शक्य आहे. मात्र, असे उद्योग निवडक अपवाद वगळता विदर्भात नावारुपास आलेले नाहीत. तरीही बेभरवशाच्या हवामानात काही भागातील शेतक ऱ्यांनी फळपिके आणि भाजीपाल्यातून भरघोस उत्पन्न घेताना विदर्भातील शेतक ऱ्यांना शेतीची नवी दिशा दाखविली आहे.
भातपिकाची बिनभरवशाची शेती करताना निसर्गाच्या कोपामुळे निराशाच्या गत्रेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ग्रामचुटिया येथील ऋषी टेंभरे या तरुण अ‍ॅटोमोबाईल अभियंत्याने नवा मार्ग दाखविला आहे. त्याने ४ एकरात काकडीची लागवड करून िठबक सिंचनाच्या साह्य़ाने दोन महिन्यात ८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले. सध्या त्याच्या शेतात दरदिवशी सरासरी २० ते २५ िक्वटल काकडीची तोड केली जात आहे. यासाठी ऋषीला एकरी ५० हजाराचा खर्च आला. चुटिया खेडय़ातील काकडी गोंदिया, नागपूर, बालाघाट, जबलपूरच्या बाजारपेठेत जात आहे. त्याच्या काकडी उत्पादन तंत्राची माहिती करून घेण्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषीतज्ज्ञ, अभ्यासक आणि तरुण शेतकरी भेट देत आहेत.  काळया आईशी निष्ठा राखणाऱ्या चिखलीच्या सतीश भगवानदास गुप्त यांनी ४ हेक्टर जमिनीत २०० टन डाळिंबाचे उत्पन्न घेऊन विक्रम प्रस्थापित केला. शिवाय आखाती देशात या दर्जेदार डाळिंबाची निर्यात करून बुलढाण्याचे नाव फळबागांच्या जागतिक नकाशावर झळकविले. कमी पाणी आणि अत्यल्प खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या सीताफळ लागवडीला विदर्भात मोठा वाव आहे. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील हळदगावला राहणारे सुरेश पाटील संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करीत असून, हेक्टरी ४ लाखांचे सीताफळाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी ‘१२ बाय ७’ फूट या पद्धतीने या पिकाची लागवड केली. आंतरपिक म्हणून लावलेल्या शेवग्यामुळे सीताफळाच्या झाडांची वाढ चांगली झाली शिवाय झाडांच्या तोडलेल्या फांद्यांचा वापर आच्छादनासाठी करण्यात आल्यामुळे शेतातील गांडुळासारखे जीवाणू चांगले काम करत आहेत. शेताभोवती धुऱ्यावर त्यांनी सागाची लागवड केली आहे. नैसर्गिक शेती करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येते याचे गुपित त्यांनी शेतक ऱ्यांना सांगितले. विदर्भातील शेतकरी सीताफळ लागवड करून हेक्टरी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.        (समाप्त)
‘अ‍ॅग्रोवेस्ट’ शेतक ऱ्यांसाठी ‘बेस्ट’
विदर्भात दरवर्षी शेतातून लाखो टन कचरा निघतो. मात्र, त्याचा काहीही उपयोग न करता तो जाळून टाकला जात असून, प्रदूषण वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘अ‍ॅग्रोवेस्ट’वर आधारित ग्रामीण भागात किमान २ हजार उद्योग सुरू झाल्यास त्यामध्ये २० हजार लोकांना रोजगार मिळू शकतो, असे शेती समीकरण महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी मांडले आहे. कापूस पऱ्हाटी, सोयाबीन भुसा, धानाचा भुसा, शेंगदाणा टरफल, एरंडी टरफल, लाकडी भुसा, गहू भुसा, सूर्यफुलांचे टरफल, ऊसाचे वेस्ट, तागाचे वेस्ट आदींपासून व्हाईट कोल तयार करता येते. ‘व्हाईट कोल’ तयार करण्यासाठी द्रव पदार्थ, रसायने व रासायनिक प्रक्रिया करावी लागत नाही. ही नैसर्गिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. व्हाईट कोलचा उपयोग देशात पेपर मिल्स, साल्वेंट एक्सट्रॅक्शन प्लॅटस, कापड गिरण्या, फळ प्रक्रिया उद्योग, दूध, साखर कारखाने, चामडे उद्योग आदी उद्योगांमध्ये होत आहे. मात्र, लाखो टन कचरा जाळला जात असल्याने शेतीपूरक जोडधंद्यासाठी अनुकूल असलेल्या या उद्योगाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही, हे वैदर्भीय शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याचे वैराळे यांनी सांगितले.