दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी (दि. २५) कराड येथे येणाऱ्या राज्यकर्त्यांना समाधिस्थळी हात लावू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. ऊसदराची चर्चा करण्यास शासनाला वेळ नसल्याने राज्यभर चक्का जाम आंदोलन छेडून आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोटारसायकल रॅलीस प्रारंभ करताना ते बोलत होते. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील उपस्थित होते. खोत यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ऊसदरासंदर्भात राज्यकर्त्यांकडे चर्चेला वेळ नाही. राज्यकर्ते दरासंबंधी चच्रेला तयार नाहीत. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हिंसक वळणाला सरकारच भाग पाडत आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ऊस दराचा निर्णय झाला नाही, तर राज्यभर चक्का जाम आंदोलन छेडू. कोणत्याही कारखान्यास उसाला हात लावू देणार नाही. सरकार ठाम भूमिका न घेता शेतकऱ्यांवरच दबाव आणत आहे. तुम्हाला आम्ही जुमानणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.