येथील प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अजित नातू यांचे सोमवारी निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. कॅन्सरचे निदान झाल्यावर गेले आठ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेरचे तीन महिने तर ते रुग्णालयातच होते. अखेर उपचारादरम्यान गेल्या सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. उल्का नातू आणि दोन मुली असा परिवार आहे.चौथी तसेच सातवीच्या परीक्षेत शिष्यवृत्ती, दहावी-बारावीत गुणवत्ता यादीत स्थान व वैद्यकीय पदवी परीक्षेत सुवर्णपदक अशी देदीप्यमान शैक्षणिक कारकीर्द असलेल्या डॉ. अजित यांना खेळांमध्येही विशेष रुची होती. महाविद्यालयाच्या फुटबॉल संघाचे ते कर्णधार होते. बॅडमिंटनमध्येही ते पारंगत होते. वैद्यकीय व्यवसायात सेवाभावी वृत्तीने काम करणारे जोडपे असे नातू दाम्पत्याचा लौकिक होता. त्यांच्या नौपाडय़ातील नेस्ट या रुग्णालयात त्यांनी अनेक गरजू रुग्णांवर अल्प दरात उपचार केले. टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघ्याची वाटी बदलणे) शस्त्रक्रियेत ते पारंगत होते. गुडघेदुखीच्या शेकडो पेशंटवर त्यांनी यशस्वी उपचार केले. एका पायाची लांबी कमी असलेल्या अनेक लहान मुलांवर त्यांनी एप्लिझो या रशियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने ठाणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.