गेल्या दोन दिवसांपासून परभणीसह मराठवाडय़ाच्या सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. औरंगाबादचे किमान तापमान १२.४, तर परभणीचे तापमान नीचांकी म्हणजे ८.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
कडाक्याच्या थंडीने परभणीकरांना पुरते गारठून टाकले आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद व जालन्यातही किमान तापमानात घट झाल्याने वळचणीला पडलेले उबदार कपडे परिधान करणे आवश्यक झाले आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने थंडी पडेल का, असा प्रश्न सर्वाच्याच मनात होता. दिवाळीत थंडी सुरू झाली. पण गेल्या ३ दिवसांपासून गारठा हुडहुडी भरविणारा ठरू लागला आहे. दिवाळीच्या दिवसांत थंडीचे अस्तित्व फारसे जाणवले नाही. मात्र, त्यानंतर थंडीने प्रभाव दाखविणे सुरू केले. सूर्यास्त लवकर होत असल्याने वातावरणात लवकर गारठा जाणवू लागतो. परभणीत याचा जनजीवनावर परिणाम जाणवू लागला आहे. मराठवाडय़ातील अन्य जिल्हय़ांतही असेच वातावरण आहे. बीडमधील तापमान १० अंश, तर नांदेडमध्ये किमान तापमानाची नोंद ११.४ होती.