‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ या सदरातील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनपर लेखांमुळे व प्रश्नसंचांमुळे दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यास खूप मदत झाली अशी या सदराचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते आहे.कांदिवलीच्या ‘परमानंद जेठानंद पंचोलिया हायस्कूल’च्या विदुला पालेकर हिने आपल्या यशात ‘यशस्वी भव’मधून मिळालेल्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले. विदुलाने दहावीत ९५.८२ टक्के गुण मिळविले आहेत. ‘यशस्वी भव’मध्ये नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांच्या लेखमालेचा चौफेर व सूक्ष्म अभ्यासाकरिता उपयोग झाल्याचे ती नमूद करते.‘यशस्वी भव’मधील सखोल व योग्य मार्गदर्शनाचा दहावीच्या परीक्षेत फारच फायदा झाला, असे नवी मुंबई महानगरपालिक संचलित ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालया’च्या गायत्री महंती हिने स्पष्ट केले. गायत्रीने दहावीत ९४ टक्के गुणांची कमाई करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आमदार मंगेश सांगळे यांच्या सहकार्याने विक्रोळीच्या ‘विकास हायस्कूल’मधील विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव’ हे सदर ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून पुरविले जात होते. या सदराचा व त्यातील प्रश्नसंचाचा विद्यार्थ्यांना फारच फायदा झाला, असे या शाळेच्या मुख्याध्यापिका वैष्णवी राऊत यांनी सांगितले. शाळेचा दहावीचा एकूण निकाल ८५.४६ टक्के लागला असून १२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळाले आहेत. शाळेतून पहिल्या आलेल्या वैभवी पडवळ या विद्यार्थिनीने तब्बल ९८ टक्क्य़ांची कमाई केली आहे.रत्नागिरीच्या फणसोप येथील ‘लक्ष्मी केशव विद्या मंदिर’ची राखी भाटकर हिनेही याच भावना व्यक्त केल्या. राखीने ‘यशस्वी भव’ या सदराचे सातत्याने वाचन केल्यामुळेच दहावीच्या परीक्षेत सुयश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राखीला ९१.८० टक्के गुण मिळाले आहेत. रत्नागिरीच्याच ‘फाटक हायस्कूल’च्या शिवानी पावसकर या दहावीला ९१.८२ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या यशात ‘यशस्वी भव’चा मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले. इथल्या ‘पटवर्धन हायस्कूल’च्या सौरभ दांडेकर (दहावीला ९२.१८टक्के) यानेही दहावीच्या तयारीत ‘यशस्वी भव’मधील सदराचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले.