अवकाशात उंच उंच जाण्याची आकांक्षा बाळगत ‘पतंगबाजी’चा निखळ आनंद देणारा पतंग महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येवला शहर परिसरात पतंगोत्सवाला विशेष महत्व असून या निमित्त बाजारपेठ सजली आहे. घराघरांत पतंगोत्सवासाठी खास बेत आखले जात आहेत. या निमित्त मांजा, आसरी आणि पतंगीच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत आहे.येवला आणि पैठणी हे नाते सर्वश्रृत असले तरी पतंगोत्सव हे या शहराचे दुसरे वैशिष्ठय़ आहे. अत्याधुनिक सुविधा आल्या असल्या तरी आजही शहर-परिसरात परंपरागत पतंगोत्सवाचे आकर्षण कायम आहे. डिसेंबर महिना सरतो न सरतो तोच शहरवासीयांना वेध लागतात ते संक्रांतीचे. बाजारात मांजा आणि फिरक्यांचे विविध पर्याय खुले असतांना घरी तयार करण्यात येणारा मांजा तयार करण्याकडे अनेकांचा कल आहे. यासाठी वर्षभर अडगळीत असलेला खलबत्ता, फुटलेल्या काचेच्या बाटल्या आणि साधा मांजा आणून घरीच खास मांजा तयार केला जातो. दुसरीकडे पैठणीसाठी उपयोगात आणले जाणारे रेशीम धागा गुंडाळण्यासाठी उपयोगात येणारी आसारी यासाठी प्रामुख्याने वापरली जाते. संक्रांतीच्या काळात या आसारीचा वापर खास ‘फिरकी’ म्हणुन होतो. एरवीच्या आसारीत या निमित्ताने काही बदल करण्यात येतात. एरवी चार पातांची असणारी आसरी काटाकुटीचा आनंद वाढविण्यासाठी सहा, आठ ते बारा पातीपर्यंत ही संख्या वाढविली जाते. यासाठी कोकणातुन चवली जातीचा बांबु आयात केला जातो. यांच्या कांडीचे (गाठ) अंतर दीड फुटापर्यंत असल्याने आसरीत याचा उपयोग प्रामुख्याने होतो. तसेच पाटमाना आणि खरसमान या जातीच्या बांबुचा उपयोग आसारीच्या चिमण्या, पाते इत्यासाठी केला जातो. ओल्या बांबूपासून तयार केलेली ही आसारी सुरूवातील वजनदार असते. यामुळे खास ही मागणी देऊन स्वतच्या सोयीनुसार पातीची संख्या ठरवत बनवून घेतली जाते. वाळविल्यानंतर वजनात २५ टक्के घट होते. विशिष्ट साहित्य वापरत तयार होणारी आसारी बाजारात चार ते बारा पातींपर्यंत पतंग शौकीनासाठी उपलब्ध आहे. यासाठी ५० ते ५०० रुपयांपर्यंतची तोषिस सोसावी लागते. या कालावधीत आसारी, दोरा व पतंग तयार करण्याच्या कामात तालुक्यांत तीन हजार कुटूंब सहभागी होतात. या व्यवसायातून जवळपास तीन कोटींची उलाढाल होते.येवल्याची मांजा तयार करण्याची पध्दतही वेगळी आहे. पैठणीसाठी तयार करण्यासाठी लागणाऱ्या सप्तरंगाचा वापर मांजाच्या रंगासाठी केला जातो. पाच दशकांपूर्वी या ठिकाणी लुग्द्दीचा मांजा होता. यासाठी भात, रंग, कोरफड, अंडी, मैदा व काही प्रमाणात काच याच्या मिश्रणातून मांजाचे विशिष्ट मिश्रण होई. पाच ते सहा फुटापर्यंत असलेल्या साध्या दोऱ्यावर तो घोटला जात असे. यानंतर वस्त्रगाळ काचेची पुड टाकत लुग्द्दीचा मांजा तयार होत असे. शहरात हवा मध्यम स्वरूपाची असल्याने येवल्यात खास येवला पतंगींची चलती आहे. हा पतंग मध्यम तावदार असल्याने महिलाही ती सहज उडवतात. या बरोबरच बैंबईदार, हैद्राबादी, सुरती, औरंगाबादी आदी पतंगी अवकाशात सहज घिरटय़ा मारतात. हवा, धागा, आसारी याचा अंदाज घेत पतंगांची काटाकाटीची स्पर्धा सुरू होते. पतंग शौकीनांचे गाव असल्याने धाब्यावर पतंग उडविण्यासाठी खास गच्ची बांधण्यात आली आहे. कुटूंबांसमवेत पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यास सुरूवात होते. भोगी, संक्रांत आणि कर तिन्ही दिवशी येवलाप्रेमींच्या उत्साहाला उधाण येते. मुंबई, पुणे, नगर, नाशिक यासह गुजरात, मध्यप्रदेश, इतर राज्यातील अनेक पतंगशौकीनांची हजेरी महोत्सवाचे वेगळेपण अधोरेखीत करते. महोत्सवात राजकीय व्यक्तीही सहभागी होतात, हे विशेष.