राज्य शासनाने नव्यानेच जाहीर केलेल्या सुधारित आत्मसमर्पण योजनेचा लाभ मिळवून कमांडर, उपकमांडर व सात महिलांसह दहा सशस्त्र नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. चळवळ सोडून लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या या सर्व नक्षलवाद्यांचे स्वागत करण्यात आले.
आज आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये तीन जोडप्यांचा समावेश आहे. यावर्षी गडचिरोली पोलिसांनी मिळविलेल्या घवघवीत यशात या आत्मसमर्पणामुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये कमांडर जगदीश उर्फ रमेश रैनू कातवो (२८,रा.इतूलनार), पोमके हेडरी (ता.एटापल्ली), सेक्शन कमांडर सुरेखा उर्फ राजकला मडावी (२३), संध्या उर्फ ज्योती काशीराम तुमरेड्डी (२५), ईमला उर्फ दुल्लो नवलू मडावी (२३), मुन्नी उर्फ चुकली कटीया नरोटे (२२), रनीता उर्फ सन्नौ गावडे (२३), आशिष उर्फ टिकरू उर्फ साईनाथ पेंदाम (२८, गट्टा दलम), सुमन उर्फ सगुना मडावी (२५, भामरागड दलम), साधू उर्फ रमेश देवू होळी (२५, सिरोंचा दलम), चिन्नी बुकलू तेलामी (२३, सिरोंचा दलम) यांचा समावेश आहे.
या सर्व नक्षलवाद्यांना मोठय़ा प्रमाणात बक्षीस मिळणार आहेत. विशेष म्हणजे, पती-पत्नीने आत्मसमर्पण केल्यास दीड लाख रुपये अतिरिक्त दिले जातात.
शस्त्रासह आत्मसमर्पण केले तर बाजारभावानुसार त्याची किंमत दिली जाते. त्याशिवाय, त्यांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत शंभर टक्के अनुदान तत्वावर दिली जाते. राहण्यासाठी भूखंड, तसेच निवास, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा व शिष्यवृत्तीचा मिळवून दिला जातो.
नक्षलाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही प्रवाहात सामील व्हावे. आत्मसमर्पितांच्या मदतीकरिता गडचिरोली जिल्हा पोलिस दल नेहमीच तत्पर असल्याचे आवाहन वाट चुकलेल्या नक्षलवाद्यांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.