कर्जत तालुक्यात दोन वेगवेगळय़ा अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. मृतांमध्ये सुटीवर आलेल्या लष्करी जवानाचा समावेश आहे.
रविवारी रात्री साडेआठ वाजता कर्जत शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील अपघातात राजेंद्र जगन्नाथ लष्कर (वय ३५, राहणार बहिरोबावाडी) या लष्करी जवानाचे निधन झाले. ते तीन दिवसांपूर्वीच सुटीवर घरी होते. मोटारसायकलने घरी जाताना पायी चालणाऱ्या व्यक्तीस त्यांची धडक बसली. त्यात ते स्वत:च रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन ते जागीच ठार झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  
दुसरा अपघात तालुक्यातील माहीजळगाव येथे कर्जत-जामखेड रस्त्यावर झाला. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. माहीजळगावकडून जामखेडकडे नव्या मोटारसायकलवर (क्रमांक नव्हता) तिघे जण जात असताना त्यांना भरधाव जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात वसंत गोरख पठारे (वय ३०), सुनील संभाजी काकडे (वय ४२, दोघे राहणार बनपिंप्री, तालुका श्रीगोंदे) हे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याचा तपास पोलीस नाईक नरसिंग शेलार हे करीत आहेत.