स्वातंत्र्यदिनी सातारा जिल्ह्य़ातील पुसेगाव येथील दुहेरी खून प्रकरणातील चार संशयित आरोपींना पोलिसांनी खारघरमधून अटक केली आहे.पुसेगाव येथील बुध गावातील करंजवाडा वस्तीमध्ये दोन गटांत हाणामारी झाली होती. या भांडणांमध्ये दोघांची हत्या करून चार संशयित आरोपी पुसेगावहून फरार होऊन नवी मुंबईमध्ये दाखल झाले होते. ही माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल वाघमारे यांच्या पथकाने खारघर वसाहतीमधील हिरानंदानी चौकामध्ये सापळा रचून या चौकडीला ताब्यात घेतले. या संशयित आरोपींची नावे समीर जाधव, योगेश जाधव, सौरभ जाधव, कमलेश जाधव अशी आहेत. सोमवारी रात्री उशिरा या चौकडीला पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उद्धव वाघ यांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती खारघर पोलिसांनी दिली.करंजवाडा या गावामध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींचे जमिनीवरून वाद होते. स्वातंत्र्यदिनी येथील जाधव चौकडीने १२ जणांच्या साहाय्याने दिलीप जाधव आणि शामराव जाधव यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.