इयत्ता दहावीतील पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार विषय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. सोमवारपासून सुरूझालेल्या प्रशिक्षण शिबिरात येत्या ४ दिवसात ६०० शिक्षकांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देण्यात येत आहेत. व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच कार्य शिक्षणाचेही प्रशिक्षण शिबिरातून देण्यात येत आहे.
जि. प. च्या शिक्षण विभागाकडून माध्यमिक शाळांमधील विषय शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सोमवारी बीड व अंबाजोगाई येथे प्रशिक्षणास सुरुवात झाली. दि. ९ पर्यंत बीड तालुक्यातील ११९, पाटोदा ३९, गेवराई ५७, आष्टी ७९, शिरूरकासार ३४, वडवणी २२ अशा ३५० शिक्षकांसाठी बीड येथे हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. यात दोन दिवस कार्यशिक्षण, तर दोन दिवस व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अंबाजोगाई येथे याच कालावधीत अंबाजोगाई तालुक्यातील ६५, धारूर १८, केज ७८, परळी ६० व माजलगाव ३८ अशा २५९ शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रशिक्षणात प्रत्येक माध्यमिक शाळेतून एका विषय शिक्षकाचे प्रशिक्षण होणे शिक्षण विभागाला अपेक्षित आहे, असे माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी सांगितले.